राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय...
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल येथे जाहीर केले. त्यामुळे येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाही स्थगित करण्यात आल्या असून त्या आता लांबणीवर पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी याबाबत सांगितले की, राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष कार्यक्रम कालच त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत. राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महापालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, वाडी, राजगुरुनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा व नगरपचायती, भडारा व गोदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या; तसेच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केले आहे.