पिढी घडविण्याचे काम करणार्‍या शिक्षकांचा आदर करणे समा

 नमुंमपा गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळ्याप्रसंगी आयुक्तांचे प्रतिपादन


नवी मुंबई (प्रतिनिधी) - शिक्षक हे भविष्यातील पिढी घडविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलचाआदर व्यक्त करणे हे समाजाचे कर्तव्य असून नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित केलेला सन्मान सोहळा हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक सन्मान सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शिक्षण पध्दती अवलंबिण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. 159 इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील मुले शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत चमकली, तसेच दहावीच्या शालांत परीक्षेतही विद्यार्थ्यांनी अत्युत्तम गुण संपादन करीत नवी मुंबईच्या नावलौकीकात भर घालण्याचे काम केले याचा विशेष अभिमान वाटतो असेही आयुक्त यावेळी म्हणाले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  धनराज गरड, शिक्षण विभागाचे उप आयुक्त जयदिप पवार, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मनोजकुमार महाले, डॉ. श्रीराम पवार, ई.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, अतिरिक्त शहर अभियंता  शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.शिक्षण विभागाचे उप आयुक्त जयदिप पवार यांनी आपल्या मनोगतात, आधुनिक शिक्षण साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचे आयुक्तांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आले. यामध्ये हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अंतिम विजेतेपद संपादन केलेल्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणारा नवी मुंबई महापालिकेच्या राजर्षी शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55, आंबेडकर नगर येथील विद्यार्थी आशिष गौतम यांस उत्कृष्ट खेळाबद्दल खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भरत पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. आशिषचे क्रीडा प्रशिक्षक प्रताप शेलार व स्वप्निल पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.  तसेच नमुंमपा शाळा क्र. 31 कोपरखैरणे येथील विद्यार्थी अथर्व महेंद्र मोरे, आयआयटी गोहाटी यांच्या वतीने आयोजित टेक एक्स्पो या राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान विषयक स्पर्धेमध्ये नमुंमपा शाळा क्र. 42 घणसोली येथील विद्यार्थिनी स्नेहल संतोष महानवर , नमुंमपा शाळा क्र. 28 वाशी येथील विद्यार्थिनी वेदांती सुजीत घरत आदींसह शालांत परीक्षेत उत्तम गुण संपादन करून उज्वल यश मिळविणार्‍या सन 2019-20 व सन 2020-21 या वर्षातील प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 5 वी ची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे 32 विद्यार्थी, इयत्ता 8 वी ची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे 12 विद्यार्थी तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांकरिता इयत्ता 8 वी ची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे 115 विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. त्यांच्यासोबत 124 मार्गदर्शक शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2019 मधील 4, सन 2020 मधील 20 व सन 2021 मधील 15 अशा एकूण 39 सेवानिवृत्त शिक्षकांनाही कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात आले.