24 जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन

 


पनवेल (प्रतिनिधी) - आता बस पुरे झाले;  दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ’जय दिबा’ असा जयघोष करत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे.  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांची महत्वपूर्ण बैठक काल (शुक्रवार दि. 21) पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खा.रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.  त्यावेळी हा निर्णय जाहीर करत यशस्वी होईपर्यँत आंदोलने करीत राहणार असल्याची गर्जना करण्यात आली. 

प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कायम उदासीन राहिलेल्या सिडकोच्या विरोधात 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करून सिडकोला जोरदार दणका देण्यात येणार आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकवटला आहे. यापूर्वी आंदोलने करत भूमिपुत्रांची ताकद सिडको आणि शासनाला दाखविण्यात आली आहे. नुकताच झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा एल्गार पुकारण्यात आला. दरम्यान सिडको व शासनाने अद्यापही त्यांची मुजोरी कायम ठेवली आहे, त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन जोरदारपणे करण्यात येणार आहे, आणि या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे या बैठकीत स्पष्ट दिसून आले. 

या बैठकीस महापौर कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीता पाटील, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजेश गायकर, सुरेश पाटील, प्रेम पाटील, विजय गायकर, दीपक पाटील, रविनाथ पाटील, मनोहर पाटील, शैलेश घाग, समिती, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.