किल्ले रायगडावर बेकायदा बांधकाम करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा!

 हिंदु जनजागृती समितीची मागणी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - किल्ले रायगडावर अनधिकृतपणे बांधकाम करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडा’वर अज्ञातांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. किल्ल्यावरील मदार मोर्चा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी मशीद मोर्चा’ असल्याचा अपप्रचार करून त्या जागेला पांढरा रंग फासून तेथे हिरवी-लाल चादर चढवण्यात आली होती. ऐतिहासिक स्थळांवर असे प्रकार होणे, हे अत्यंत संतापजनक असून रायगड किल्ल्याचे पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार आहे. तसेच यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न दिसून येतो. या प्रकरणी त्वरित आवाज उठवल्याने हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले असले, तरी, हे बांधकाम कोणी केले, कोणत्या उद्देशाने केले, याचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधकारी स्नेहा उबाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी समितीच्या विशाखा आठवले, गिरीश जोशी आणि उदय तेली हे उपस्थित होते. मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
किल्ले विशाळगडावर पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे 100 हून अधिक लहान-मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. दुसरीकडे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी उघड्यावर आहेत. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर होत असलेले अतिक्रमण हा गंभीर विषय आहे. ही अतिक्रमणे तात्काळ हटवणे, हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे. या प्रकरणी ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि ज्या व्यक्तींनी हे कृत्य केले, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत,तसेच किल्ले रायगडाप्रमाणे राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी. समितीच्या मागण्यांवर पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी कृती न केल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात आंदोलन छेडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.