13 जानेवारीला ‘भूमिपुत्र परिषद’ तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन!
पनवेल (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी दि.बा.पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 13 जानेवारी रोजी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील समस्त भूमिपुत्रांची ’भूमिपुत्र परिषदेचे आयोजन तर 24 जानेवारी रोजी विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी पनवेल येथे आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबांचे नाव मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले असून जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना यावेळी करण्यात आली.
लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष माजी खा. संजीव नाईक, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, सरचिटणीस भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, सहचिटणीस गुलाब वझे, संतोष केणे, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, सदस्य नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, दशरथ भगत, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, विजय गायकर, जयेश आक्रे, भुवनेश्वर धनु, जितेंद्र म्हात्रे, गजानन मांगरूळकर, सुनील पाटील, डी. बी. पाटील, यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, ठाणे, कल्याण आदी विभागातील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खा.रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते या पत्रकार परिषदेला येऊ शकले नाहीत. ते पुढे म्हणाले कि, पनवेल, उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे अस्तित्व जपण्याचे काम करीत आहेत. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना काम देणे ही जबाबदारी सरकारची आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याबरोबरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे ही सर्व भूमिपुत्रांची आग्रही आणि रास्त मागणी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील वर्षी 10 जून, 24 जून आणि 9 ऑगस्टच्या आंदोलना निमित्ताने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने सारा भूमिपुत्र समाज एकवटला. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या भूमिपुत्रांची ताकत संपूर्ण भारताने पाहिली, आता दिबांच्या जन्मदिनी म्हणजेच 13 जानेवारी रोजी भव्य भूमिपुत्र परिषद कोल्ही कोपरगाव, दत्त मंदिराजवळ (ता. पनवेल) विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आली आहे. आणि ही परिषद म्हणजे प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या अस्मितेची अस्तित्वाची आणि त्यांच्यावर होणार्या अन्यायाची जाणिव करून देणारी आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीसाठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येत्या 13 जानेवारीला होणार्या भूमिपुत्र परिषदेच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या सर्व विषयांची उजळणी होणार आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे. राज्य सरकार भूमिपुत्रांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करत आहे. सिडकोचा ठराव रद्द करून नव्याने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करून राज्य सरकारला द्यावा आणि तो प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा, अशी आग्रही मागणी सातत्याने भूमिपुत्रांकडून होत असतानाही त्याला वाटाणाच्या अक्षता लावण्याचे काम सिडको आणि ठाकरे सरकार करीत आहे. त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळाचे सुरु असलेले सर्व काम बंद पाडण्यात येणार आहे, असा एल्गारही यावेळी रामशेठ ठाकूर यांनी समितीच्यावतीने जाहीर केला.
भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. हि नुसती लढाई नाही तर हक्क आहे. भूमिपुत्रांच्या परिषदेत स्थनिक, प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे ठराव मांडले जाणार आहे. परवानगी आणि कोरोनाचे नियम पाळून ही परिषद होणार आहे असे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष व माजी खा.संजीव नाईक यांनी सांगितले. तर लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे ही भूमिका अनेकदा आंदोलन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत विशद झाली आहे, आणि भूमिपुत्रांना काय म्हणायचे आहे हे ही त्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या न्यायिक भावनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. जो पर्यत दिबासाहेबांचे नाव विमानतळाला मिळत नाही, तो पर्यंत हा लढा कायम असेल असा पुनरुच्चार लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष व आ. प्रशांत ठाकूर यांनी केला.