ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेच्यावतीने भंडार्ली येथे कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभा करण्यात येत असून या प्रकल्पांचा स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी महापालिकेच्यावतीने घेण्यात येणार आहे. तरी सर्व स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
भंडार्ली येथे उभारण्यात येणार्या प्रकल्पासंबंधी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष समिती समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काल प्रकल्पाबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे.यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, नगरसेवक रमाकांत मढवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 1) अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त आंधळे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच भंडार्ली संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते.