अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दोन्ही पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन, एकत्रित येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता. जिल्ह्याचा कारभार पाहताना शिवसेना आमदारांना विश्वासात घेण्याच्या सूचना पालकमंत्री आदिती तटकरे यांना दिल्या होत्या.
त्यानंतर काही दिवस सगळे काही सुरळीत सुरु असल्याचे जाणवत होते. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाला जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावरून पुन्हा एकदा तोंड फुटले. दोन्ही पक्षात जल जिवन मिशनच्या योजनांवरून वादाची ठिणगी पडली. यावर नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेनेशी जुळवून घेण्यास नकार दिला. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. राष्ट्रवादीने शेकापशी आघाडी करून त्यांनी माणगाव, पालीची निवडणूक लढवली, तळा नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा पराभव केला. माणगावमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. यामुळे दोन्ही पक्षातील वाद अधिकच विकोपाला गेले.
त्यामुळे शिवसेनेचे तिन्ही आमदार आता तटकरेंविरोधात एकवटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषद घेऊन थेट पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, आणि माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राजीव साबळे उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अधिकच विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
सर्वसमावेशक कारभार महाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर व्हावा अशी आमची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा आता फोल ठरली आहे. मनमानी पद्धतीने पालकमंत्री तटकरे कारभार करत असून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात लुडबूड करत आहेत. परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे रायगडचा पालकमंत्री बदला अशी मागणी करत आहोत, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.