रायगड - राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित दिसत असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र या दोन्ही पक्षात अंतर्गत कुरघोडी सुरुच आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदलण्यासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आक्रमक झाले असताना गोगावले यांनाच बदलण्याची वेळ आली असल्याचा पलटवार राष्ट्रवादीतर्फे सुरु झाला आहे.
याबाबत सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कुरखोडी समोर आली आहे. नगरपंचायत निवडणुकीत विभिन्न आघाडी व युतीने राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे बोलले जातेय. नेत्यांनी केलेल्या मागणीनंतर आता कार्यकर्ते आपसात भिडायला सुरुवात झाल्याने या दोन्ही पक्षांतील वाद इतका विकोपाला गेला आहे की त्याचे पडसाद आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमटू शकतात.
सध्या जिल्ह्यात आघाडीत बिघाडी सुरू झाली असल्याचे चित्र समोर आले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद विकोपाला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री आदिती तटकरे यांचे जोरदार समर्थन करत ’अद्वितीय आदितीताई’ या टॅगलाईनने सपोर्ट पालकमंत्री अशा आशयाची पोस्टर्स सोशल मीडियावर झळकवली गेली आहेत. त्याला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगर पंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी करतात, असा आरोप शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील तीनही सेना आमदारांच्या वतीने केला. यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती. (मजुरीकरून जगणार्या वृद्धासोबत क्रूरता; चाकुने वार करत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात) या प्रकरणावर आदिती तटकरे यांनी थेट उत्तर देणे टाळले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर शिवसेनेला खिजवायला सुरुवात केली. ज्यामध्ये ’पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध असलेला डायलॉग वापरुन तयार केलेली पोस्ट जास्त चर्चेत आली आहे.
’लडकी समजके फ्लॉवर समझे क्या, फायर है हम’ या पोस्टमुळे शिवसैनिक अधिकच आक्रमक बनले आहेत. राष्ट्रवादीच्या पोस्टबाजीला प्रत्युत्तर देताना ’काल पण ... आज पण आणि उद्या पण शिवसेनाच’ या टॅगलाईनने पोस्ट तयार करून सोशल माध्यमातून व्हायरल केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगडमधील शिवसैनिकांनी फक्त राष्ट्रवादीची भांडी घासायची काय? असा सवाल शिवसैनिक सोशल मीडियावर विचारत आहेत. तर पालकमंत्री नव्हे महाडचा आमदार बदलण्याची वेळ आली आहे, अशा पोस्ट राष्ट्रवादीकडून व्हायरल होत आहेत. एकूणच पालकमंत्री बदलण्याच्या मागणीवरुन रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या तरी सोशल मीडिया युद्ध जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हा वाद रस्त्यावर यायला उशीर लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.