नवीन प्रभाग रचनेवर भाजपचा तीव्र आक्षेप पालिका अधिकार्‍यांनी सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली चुकीच्या पध्दतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी सोमवारी मध्यरात्री नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. मात्र या नवीन प्रभाग रचनेवर नवी मुंबई भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून चुकीच्या आणि नियमबाहय पध्दतीने  ही प्रभाग रचना झाली असल्याचा आरोप करत,याविरोधात भाजपा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा ऐरोलीचे भाजपचे आ. गणेश नाईक यांनी दिला आहे.

राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पालिका क्षेत्रात 11 नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकुण प्रभागांची संख्या 111 वरून 122 वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री ही नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली. मात्र या नविन प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत आ. गणेश नाईक यांनी प्रभाग रचना करणार्‍या पालिकेच्या अधिकार्‍यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली या पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठीच प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने केली असल्याचा गंभीर  आरोप केला आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी सामिल असल्याचा आरोपही लगावण्यात आला आहे.

शहराच्या एकुण लोकसंख्येला एकुण प्रभागांनी भागून जे उत्तर येईल तेवढी सरासरी लोकसंख्या एका प्रभागाची असायला हवी होती. मात्र संबधित अधिकार्‍यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठी प्रभाग रचनेचे चुकीचे गणित केले असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पालिका निवडणुकीच्या संभाव्य प्रभाग रचनेत बेकायदा काम होण्याची शक्यता आमदार गणेश नाईक यांनी यापूर्वी राज्यपाल, निवडणुक आयोग, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त या सर्वांना वेळोवेळी पत्र पाठवून व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर देखील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी झालीच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

या नव्या प्रभाग रचनेत, ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली, दिघा या भागातील प्रभाग 23 हजार लोकसंख्येचे केले आहेत. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात जास्त प्रभाग झाले आहेत.  तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात 30 हजार लोकसंख्येचे प्रभाग केल्याने या विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची संख्या कमी झाली आहे. 122 प्रभागांपैकी अनेक  प्रभागांमध्ये चुकीची रचना करण्यात आली असून या विरोधात कोर्टात दाद मागणार आहे. ज्या ज्या प्रभागात चुकीची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्या प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असून निष्णात वकीलांची नियुक्ती करणार आहे, असे आ. गणेश नाईक म्हणाले.