ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे जिल्ह्यात 2020-21 या वर्षात राबविण्यात आलेल्या विविध विकास कार्यक्रमांवर जिल्हा वार्षिक योजनेद्वारे 542 कोटी खर्च करण्यात आले आहेत. सामाजिक व सामूहिक सेवा योजनांवर सर्वाधिक 193 कोटी (35.60 टक्के) खर्च करण्यात आले असून एकूण खर्चापैकी सर्वसाधारण उपाययोजनेवर 394 कोटी, आदिवासी उपयोजनेवर 61 कोटी, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेवर 13 कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेवर 72 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत जिल्ह्यानिहाय सामाजिक व आर्थिक बाबींविषयी माहिती देणारे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा सांख्यिकी अधिकारी मनिषा माने यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, 2020-21 या वर्षांत विविध विकास योजनांवर खर्च करण्यात आला आहे. त्यात कृषी व संलग्न सेवेसाठी 88 कोटी, ग्रामीण विकासाठी 44 कोटी, पाटबंधारे आणि पूर नियंत्रणासाठी 26 कोटी, उर्जासाठी 11 कोटी, परिवहनसाठी 58 कोटी सामान्य आर्थिक सेवा योजनांसाठी 13 कोटी, सामाजिक व सामुहिक सेवा योजनांसाठी 193 कोटी तर सामान्य सेवा योजनांसाठी 106 कोटी खर्च करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत 2020-21 साठीची जिल्ह्यातील विविध सामाजिक व आर्थिक बाबीसंबंधीची माहिती एकत्रित करुन जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तयार करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जाधव यांनी सांगितले.
या पुस्तकात जिल्हयाचे भौगोलिक स्थान, हवामान, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, कृषी, रस्ते, जलसिंचन, उद्योगधंदे, मत्स्यव्यवसाय, सहकार, आरोग्य, शिक्षण अशा अनेक विषयांवरील सांख्यिकीय माहितीचे संकलन करण्यात आले आहे. त्यासाठी शासकीय व निमशासकीय अशा 120 यंत्रणांकडून माहिती मागविण्यात आल्याचे महिला जिल्हा सांख्यिकी अधिकारी माने यांनी सांगितले. यावेळी संशोधक सहायक मेघा मयेकर, सांख्यिकी सहायक महेश जोशी आदी उपस्थित होते.